प्रयोगशील विचार

विकास

‘विकासाची आजवरची मंद गती मान्य केली तरीही गेल्या पन्नास वर्षांत आम्ही जे काही मिळवले-कमावले आहे त्याचे महत्त्व मी मुळीच कमी लेखणार नाही. तंत्रशिक्षित, तंत्रकुशल आणि ज्ञानविज्ञानसंपन्न असे सर्वाधिक, मनुष्यबळ लाभलेल्या देशांमध्ये आज आपली गणना होते. तरी आजही दारिद्र्यरेषेखाली जीवन कंठणाऱ्यांची सर्वाधिक संख्या आमच्या देशात आहे.’

‘माझ्या मते पुढील काही काळात मनुष्यबळ विकासाशी संलग्न अशा अनेक मुद्द्यांना सर्वाधिक महत्त्व देण्यावाचून पर्याय नाही.’

‘ढोबळ मानाने आपले यशापयश दोन मूलभूत बाबींवर अवलंबून राहील. उपलब्ध साधनसामग्रीचा विनियोग आम्ही किती चांगल्या प्रकारे करून घेतो, ही त्यांतील पहिली बाब. तर, आपल्या समस्यांचे निराकरण आपणच करण्याच्या दृष्टीने विविध समाजसमूहांचे सक्षमीकरण आम्ही किती प्रामाणिकपणे आणि कल्पकतेने घडवून आणतो, ही झाली दुसरी बाब.’

जाणता लोकनेता ह्या नात्याने भविष्याबाबत ते परखडपणे म्हणतात,

‘राजकारणाकडे बघण्याचा आपल्या देशवासियांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. राजकारण्यांचा दृष्टिकोन बदलत नसेल तर निदान नवीन पिढीचा व सर्वसामान्य लोकांचा दृष्टिकोन तरी बदलायला हवा.’

‘प्रचंड मनुष्यसंख्येचे मनुष्यशक्तीमध्ये व मनुष्यसंपत्तीमध्ये रूपांतर करायला हवे. लोकांसमोर सतत विकासाभिमुख दृष्टिकोन मांडायला हवा. राजकारणाच्या क्षेत्रातील नवीन पिढीला तरी याचे भान राखावेच लागेल.’

– ‘शेती हेच आमचे प्रगतीचे, वाढीचे मुख्य साधन असेल अशी माझी दृढ धारणा आहे. त्यासाठी कृषीआधारित उद्योग आणि पायाभूत सुखसुविधा यांत अतिशय मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे. शेतीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आम्हांला जैवतंत्रज्ञानातील अत्याधुनिक, नवीनतर सुधारणांची, प्रगतीची कास धरावी लागेल.

आमचे शेतकरी, वैज्ञानिक, उद्योजक आणि विविध सेवासुविधांचे पुरवठेदार यांना त्यासाठी या दिशेने सुसूत्रमय, एकत्रित, एकात्म स्वरूपाचे प्रयत्न करावे लागतील. जैवतंत्रज्ञानाच्या जोडीनेच माहिती-तंत्रज्ञान ही विज्ञानाची आणखी एक शाखा आमच्या भविष्यकालीन विकासाच्या दृष्टीने कळीची ठरणार आहे.

‘बारामती पॅटर्न’

विकासाच्या ‘बारामती पॅटर्न’ ची व्याख्या शरदजी अशी करतात,
‘सर्व प्रकारच्या अडथळ्यांशी सामना करीत प्रतिकूलतेस समोरासमोर भिडणे म्हणजे ‘बारामती पॅटर्न!’

बारामतीचे वार्षिक पर्जन्यमान आहे अवघे आठ इंच!

जवळपास ७० टक्क्यांहून अधिक क्षेत्र अवर्षणग्रस्त आहे. असे असूनही या परिसरात आज १२ साखर कारखाने उभे आहेत. इथे तयार होणाऱ्या द्राक्षांची नित्य निर्यात होते.

संपूर्ण देशभरात वितरित होणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन बारामतीतच होते. सर्व प्रकारच्या अडचणी, प्रतिकूलतांचा सामना करीतच हे सारे साध्य केले गेले आहे.
गेल्या काही काळात कृषिक्षेत्राला लक्षणीय यश लाभत असले तरी शेतकरी व कृषी शास्त्रज्ञांमधील संवाद आता वाढायला हवा असे शरद पवारांचे मत आहे. कृषिक्षेत्रासमोरील अनेक आव्हाने त्यांना खुणावत आहेत. अन्नसुरक्षेवरील वाढता दबाव जाणवतो आहे. उत्पादन आणि विक्री आघाड्यांचा समन्वय किती आवश्यक आहे याचे संपूर्ण भान त्यांना आहे.

‘कृषिक्षेत्रात होणारे संशोधन स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीस प्राधान्य देणारे व शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञानाचे धडे देणारे असले पाहिजे. त्यासाठी शेतकरी, शास्त्रज्ञ व संलग्न क्षेत्रांतील सर्व कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात सहकार्य गरजेचे आहे.
अन्नधान्य, बागायती पिके, पशुधन, मच्छिमारी आणि संबंधित क्षेत्रांतील उत्पादन व उत्पादनकता वाढविण्यासाठी आपल्याला योग्य तंत्रज्ञान विकसित करावे लागणार आहे. त्या दृष्टीने टाकलेली पावले –

इंडियन कौन्सिल ऑफ ऍग्रिकल्चरल रिसर्चची स्थापना.

सध्या या संस्थेच्या १०८ इन्स्टिट्यूट्स देशाच्या कानाकोपऱ्यात काम करीत आहेत.

६९ कृषी विद्यापीठे व ६२७ कृषिविज्ञान केंद्रे कार्यरत आहेत. पारंपरिक ज्ञान आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ त्यातील ज्ञानप्रणालीत आढळून येतो. स्थानिक प्रश्नांवर शेतकरी स्वत: काही कल्पक उपाय शोधून काढत असतात. त्यांची शास्त्रशुध्द तपासणी व विकसन यावर पवारसाहेब भर देतात.

कोणत्याही बाबीचा सर्वांगीण विचार कसा करावा याचा वस्तुपाठच शरद पवारांकडून बऱ्याच वेळा शिकायला, अनुभवायला मिळतो.

शेतकरी शहराकडे न वळता गावात राहावा यासाठी काय करता येईल? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न देशाला सातत्याने भेडसावत आलेला आहे.

सदर प्रश्नाच्या उत्तरादाखल पवारसाहेब जे विचारमंथन मांडतात ते लक्षणीय आहे. एकीकडे शेतीला महत्त्व देत असतानाच ते शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा आणि उदरनिर्वाहाचा विचार करतात.

‘शेतकरी गावात राहावा यासाठी सर्वांत प्रथम, शेतकऱ्याने सर्वकाळ आणि सर्वतोपरी शेतीवरच अवलंबून राहावे, हा विचार आता सोडावा लागेल. मुळात गावातील त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न का निर्माण झाला?

– शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या वाढली.
– शेतीचे दरडोई अथवा दर कुटुंबामागील क्षेत्र घटले.
– जमिनीची उपलब्धता कमी झाली.
– शेतीमध्ये खासगी तशीच सरकारी गुंतवणूक कमी झाली.
– शेती व्यवसायाच्या विस्तार-विकासासाठी आवश्यक असणार्‍या पायाभूत सेवासुविधा पुरविल्या गेल्या नाहीत.

‘मूलभूत प्रश्न सुटले तर शेतकरी गावात राहील ना? पाण्याची समस्या! ती सुटली तर पुढचे सारे प्रयत्न!

कोणतेही राज्य अथवा शहर विकसित करताना पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे लागते आणि त्याचा विपरित परिणाम शेतीवर होतो. ‘बारामती पॅटर्न’ मुळे अनेक समस्यांना आळा बसतो.

शरद पवार कळकळीने शेतकऱ्यांना आवाहन करतात, ‘मला चिंता एका गोष्टीची आहे, की संकट आले, हाती आलेले पीक गेले त्यामुळे उद्विग्न शेतकरी चुकीचे पाऊल उचलतात. मी जवळपास १०-१२ जिल्ह्यांत जाऊन आलो. संकट मोठे आहे. धैर्याने सामना करायचा आहे. घाबरून जीव गमवायचा आणि कुटुंबासमोर आणखी समस्या निर्माण करायच्या ही गोष्ट महाराष्ट्राची भक्कम परंपरा माहीत असणार्‍या व्यक्तीला शोभणारी नाही. संकटग्रस्त शेतकरी बांधवांनो, अतिरेकी व टोकाचा मरणाकडे जाणारा मार्ग अवलंबू नका. तुम्ही एकाकी नाही. एकटे नाही.’

संकटमोचक

राजकीय क्षेत्रातील अथवा समाजजीवनातील एखादा अवघड पेचप्रसंग असो वा मूलभूत संघर्षाचा एखादा नाजूक, गुंतागुंतीचा प्रश्न असो, व्यापक हिताच्या व सामंजस्याच्या मध्यबिंदूवर आणून समाधानकारक तोडगा काढणारे संकटमोचक म्हणजे फक्त आणि फक्त पवारसाहेबच!

पवारसाहेबांचे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांच्याशी डॉ.सी.डी.माई त्यांची तुलना करतात, ‘देश ज्यावेळी युध्दाच्या संकटात सापडला होता, तेव्हा वृत्तपत्रात प्रसिध्द झाले होते की, हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला. हे प्रतीक पवारसाहेबांना लावायचे झाल्यास ‘कृष्णा-गोदावरी ही गंगेच्या मदतीला धावून गेली आणि आपण कृषिक्षेत्रातील समस्यांना पुरून उरलो’ असे म्हणायला हरकत नाही. दुसरी हरित क्रांती त्यामुळेच केवळ कागदावर न राहता आपण भूमीवर आणू शकलो.

सर्व पातळींवर संकटकाळात प्रतिकारात्मक सक्रिय हालचाल करून संकटाची तीव्रता कमी करणे हे शरद पवारच करू जाणोत!

१९९३ सालची मुंबईतील दंगल हे याचे ठळक उदाहरण होय. संकटाला परतवून लावण्याची आणि संकटग्रस्तांसाठी ठामपणे उभे राहण्याची पवारसाहेबांची क्षमता अतुलनीय आहे. प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने अक्षरश: घराघरांत पोहोचून एखाद्या जाणत्या आणि स्वकियाने सांगाव्यात तशा चार समजुतीच्या गोष्टी शरद पवारांनी सांगत सूत्रे हाती घेतल्यावर विदारक दंगलीच्या ज्वाळा आपसुक शमू लागल्या होत्या.

एखादा राजकीय पेचप्रसंग असो, विभागीय दंगल असो वा नुकतीच घडलेली माळीण गावातील दुर्घटना असो, शरद पवारांची हजेरी ही केवळ तोंडदेखली कधीच नसते, तिला कृतिशीलतेचे पाठबळ असते.

त्याचे कारण त्यांच्या बालपणापासूनच्या घडणीत सापडते. ते चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले नाहीत. मात्र सामाजिक मूल्यांप्रती आदर बाळगणारे घराणे असा लौकिक असणाऱ्या एका मोठ्या कुटुंबात पवार यांचा जन्म झाला. अडचणीच्या आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढीत त्यांनी वाटचाल केलेली आहे. त्यांच्या आईचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव असल्याचे ते मानतात. १९३६ साली ती पुणे लोकल बोर्डावर निवडून आली. आर्थिक परिस्थिती बेताची. धाडस हा तिचा मूलमंत्र होता. हे धाडसच संकटाशी दोन हात करायला शिकवत असते.

संकट जितके मोठे तितकी त्याला तोंड द्यायला आवश्यक असणारी स्थितप्रज्ञता सामान्य माणसांपासून नेत्यांपर्यंत सर्वांना वाढवावी लागते. तसेच तहान लागली की विहीर खणून चालत नाही. आपले नित्य व्यवहार आणि जीवन सुस्थित असण्याचा प्रयत्न संकटकाळात परिस्थिती हाताळण्यास सहाय्यकारी ठरतो. याचे प्रत्यंतर आले जागतिक मंदीच्या काळात!

शरद पवारांच्या बौध्दिक पाठबळावर पोसलेली भारतीय शेती या काळात भारताचा आर्थिक आधार ठरली.

जागतिक आर्थिक मंदीच्या संकटामुळे जगाच्या तुलनेत भारतालाही फटका बसला. परंतु भारताला वाचवले ते भारतीय शेतीने.

शेती, व्यापार आणि त्याला अनुलक्षून असलेले विविध उद्योगधंदे यांमुळे जागतिक मंदीच्या आर्थिक झळा आपल्याला फारशा बसल्या नाहीत. पवारांच्या दूरदृष्टीचा आणि प्रयत्नांचा हा असा परिपाक परिणामांच्या स्वरूपात आपल्याला अनुभवायला मिळाला.

संबंधित बाबीची, घटनेची, परिस्थितीची नस अचूक ओळखणे, ती सापडणे खूप गरजेचे असते. त्यासाठी व्यासंगाची बैठक लाभलेली सूक्ष्म दृष्टी आवश्यक असते. ती पवारसाहेबांनी कमावलेली आहे हे त्यांचे मुख्य वैशिष्ट्य!

जागतिक मंदीचे संभाव्य संकट नजरेसमोर ठेवून काही त्यांनी कृषिविकासाची धुरा खांद्यावर घेतली नव्हती पण संकटकाळात ती तयारी कामी आली एवढे खरे! प्रयत्नांतील सातत्य माणसाला उपयोगी पडते ही खूणगाठ पवारसाहेबांनी कारकिर्दीच्या प्रारंभीच बांधलेली होती. त्याचीच अंमलबजावणी ते नित्य करीत आलेले दिसतात.

उपलब्ध साधन-सामग्रीचा उपयोग करून प्रतिकूलतेतून मार्ग काढा हा विचाराचा ठसा शरद पवार त्यांच्या आचारातून जनमानसावर बिंबवतात, म्हणूनच सर्वसामान्य जनतेला ते संकटकाळी धावून येणारे संकटमोचक वाटतात.

पवारसाहेब म्हणजे महाराष्ट्राच्या सुख दु:खात सहभागी झालेले नेतृत्व आहेत. दुष्काळ पडला तर मदतीला उभे राहिले शरद पवार! लातूरला भूकंप झाला तेथे उभे राहिले शरद पवार! अतिवृष्टीने विदर्भ अडचणीत आला उभे राहिले शरद पवार!

तेव्हा मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. पवारसाहेबांना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनी तीन दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांचा दौरा केला. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांना सर्वेक्षणाच्या सूचना दिल्या. ते रिपोर्ट घेऊन पंतप्रधानांची भेट घेतली. नुकसानीची माहिती दिली आणि मदतीचा आग्रह धरला. पवारसाहेबांच्या प्रयत्नांमुळेच विदर्भातील शेतकऱ्यांना केंद्रशासनाच्या माध्यमातून ९२१ कोटी रुपयांची मदत मिळाली.

अशी कितीतरी उदाहरणे………

शरद पवारांना सरकारकडून अपेक्षित नवीन भूमिका

  • विविध वस्तू व सेवांच्या प्रत्यक्ष उत्पादनाची जबाबदारी स्वत:कडे घेण्याऐवजी वस्तू व सेवांचे उत्पादन सुलभपणे करता यावे यासाठी पूरक घटक म्हणून सरकारने कार्यरत राहावे.
  • रोजगार निर्मितीमध्ये सहभाग घ्यावा.
  • खासगी क्षेत्राबरोबर भागीदारीच्या तत्त्वावर अर्थकारणात सक्रिय राहण्यासाठी पावले उचलावीत.
  • परदेशी कंपन्यांबरोबर स्पर्धा करण्यासाठी देशी अर्थकारणात क्रियाशील बनावे.
  • महिला तसेच समाजातील एकदंरच वंचित, उपेक्षित घटकांचे सक्षमीकरण घडवून आणण्यासारख्या सामाजिक गरजेची परिपूर्ती करण्याबाबत कटिबध्द व्हावे.